पुणे : ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षांत सर्वांना स्वस्तातील घरे उपलब्ध करून दिली जातील’, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
‘पीएमआरडीए’ने औंध येथील भीमसेन जोशी सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, आयुक्त किरण गिते, आयुक्त श्रावण हर्डीकर, हुडकोच्या वैजयंती महाबळ, क्रेडाईचे नॅशनलचे प्रेसिडेंट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, मराठी बांधकाम व्यावसाईक असोसिएशनचे गजेंद्र पवार यांच्यासह अनेक विकसक, बांधकाम व्यावसायिक, ग्राहक आणि मान्यवर उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारने ठेवलेले उद्दिष्ट २०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यातून पुणे जिल्ह्याचे जीवनमान उंचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. नोकरी, व्यवसाय व अन्य कारणास्तव लोक शहराकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कुटुंबाचे विकेंद्रीकरण होत आहे. शहरात आल्यावर प्रारंभी मिळेल त्या जागेत लोक राहतात. काही कालावधीनंतर ते आपले जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी शहरात स्वत:चे घर असावी, अशी त्यांची नैसर्गिक अपेक्षा असते; पण शहरातील जागेंच्या दरामुळे सर्वसामान्यांना शहरात घर घेणे शक्य होत नाही. याचाच विचार करून केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देत आहे.’
अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात २०२२पर्यंत १९.४० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात दोन लाख १९ हजार घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रस्ते, पाणी यांसारख्या भौतिक गरजा ही पुरवण्याची आमची जबाबदारी आहे. ‘पीएमआरडीए’ आणि ‘म्हाडा’च्या मदतीने पुणे जिल्याचे हे उद्दिष्ट आम्ही नक्की पूर्ण करू.’
किरण गिते म्हणाले, ‘सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रयत्नशील असून प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहिती देण्यासाठी स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन केला जात आहे. या योजनेच्या सफलतेसाठी खासगी बांधकाम व्यावासायिकांची मदत घेतली जाणार आहे.’
श्रावण हर्डीकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची घोडदौड वेगाने सुरू व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही सहभाग नोंदवल्याचे सांगितले.
सतीश मगर म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या या योजनांमुळे बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले असून, यामुळे या व्यवसायाला आलेली मरगळ झटकण्यास मदत होईल. सर्व सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी ‘क्रेडाई’कडूनही लागेल ती मदत देण्यात येईल.’